उपनिषदे ही आम्हा भारतीयांचा आध्यात्मिक वारसा आहे. परंतु ‘भारतातल्या लोकांना सुद्धा आपल्या स्वत:च्या वारशाची कल्पना नाही.’ हेच कारण असावे काय की स्वामी विवेकानंद वारंवार वेद व उपनिषदे यांबाबतच बोलताना आढळतात. ते एका ठिकाणी म्हणतात, ‘‘तुम्ही बारकाईने पाहिले असल्यास तुम्हाला असे आढळेल की, उपनिषदांतील अवतरणांखेरीज दुसरे कोणतेही अवतरण मी कधीच दिलेले नाही. ... वेद, वेदान्त व इतर सारे तत्त्वज्ञान ह्या सगळ्यांचे सार ‘सामर्थ्य’ या एकाच शब्दात सामावलेले आहे.’’ म्हणून उपनिषदे निर्भय होण्यास सांगतात. स्वामीजी म्हणतात, ‘‘एखाद्या बाँबगोळ्याप्रमाणे अज्ञानराशीवर आदळणारा उपनिषदात जर कोणता एक शब्द असेल तर तो म्हणजे ‘अभी:’ — निर्भयता.’’ सर्व उपनिषदांमध्ये स्वामी विवेकानंदांना कठोपनिषद अतिशय प्रिय होते. त्यामुळे ‘विवेकानंद ग्रंथावली’त स्वामीजींनी केलेल्या विविध विषयांच्या चर्चेत, विवरणांत तसेच विचारांमध्ये पदोपदी कठ-उपनिषदातील श्लोक व त्यांवरील भाष्य उद्धृत करण्यात आले आहे. त्यांचा लाभ आपणा सर्वांना व्हावा यासाठी रामकृष्ण मठ, चेन्नई येथून प्रसिद्ध होणार्या ‘वेदान्त केसरी’ या इंग्रजी मासिकात Complete Works of Swami Vivekananda मध्ये जागोजागी आलेल्या कठोपनिषदाशी संबंधित विचारांचे संकलन पुण्याचे गणिताचे सेवानिवृत्त अध्यापक श्री. व्ही. राधाकृष्णन् यांनी केले आहे. प्रस्तुत पुस्तक याचा मराठी अनुवाद आहे. यात ‘स्वामी विवेकानंद ग्रंथावली’मधून स्वामीजींच्या उपरोक्त विचारांचे संकलन केले आहे.